मुंबई : बहुचर्चीत शिवभोजनाची प्रतिक्षा आता संपणार आहे. गरी, गरजूंना राज्यभरात १० रुपयांत जेवणाची थाळी योजनेची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी या योजनेचा आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळानं या शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती. ती सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार होती. त्यासाठी तीन महिन्यांत ६ कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ५० ठिकाणी शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार होती. या योजनेची आता राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतल्यानंतर दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी #शिवभोजन योजनेचा घेतला आढावा. २६ जानेवारीपासून योजनेची राज्यभर अंमलबजावणी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश pic.twitter.com/6t2MzcTFKf
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 3, 2020
थाळीमध्ये काय असणार…
सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे.