अहमदनगर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्र विकास आघाडी सारखा प्रयोग राबवणार आहेत. मला कालच ममता बॅनर्जींचं पत्र आलं आहे. त्या म्हणाल्या आम्ही देखील पुढाकार घेऊन एक बैठक बोलावली आहे. आम्ही अजून चर्चा करुन बाकीच्या लोकांशी बोलू अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, मी परवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया वाचली, त्यांनी असे म्हटले की महाराष्ट्रातून शरद पवारांनी जो निर्णय घेतला त्यातून आम्हाला प्रेरणा मिळली. जर असा निर्णय बाकी सर्वांनी करायचा ठरवलं तर लोकांना पर्याय मिळेल. आम्ही समान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या मनात विश्वास आहे, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्र विकास आघाडीतील खातेवाटपावरून बोलताना सांगितले की, ज्यांनी शपथ घेतली, त्यांच्या खात्याबाबत जो तो पक्ष ठरवेल. मात्र मंत्रिमंडळात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचे प्रयत्न आम्ही केला आहे. त्यांना जास्त काम आम्ही देणार आहोत. राज्यमंत्री कमी आहे, मात्र प्रत्येकाला जास्त खाते देणार असून, त्याचा निर्णय आज किंवा उद्या होईल असंही पवारांनी सांगितलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कोणी नाराज नाही. आमच्याकडे चित्र वेगळेच आहे. मी विचारले की गृहमंत्री तुम्हाला हवे का, मात्र सर्वांनी नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खाते वाटपावरुन अजिबात दबाव नाही. खात्याचे सर्व निर्णय झाले आहेत. कोणाकडे काय द्यायचे याचा निर्णय झाला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.