भिवंडी : केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NPR) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NRC) हे मुस्लीमविरोधात नसून मुस्लीम फक्त बहाणा आहे. देशातील एससी, एसटी, ओबीसी हे केंद्र सरकारच्या निशाण्यावर आहेत. असा गंभीर आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे.
कायद्याविरोधात संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने भिवंडीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. कोळसे म्हणाले, ‘देशातील बहुजन भूमिपुत्र समाजाला आर्य भटांनी हजारो वर्षे नागवे केले आहे. ब्राह्मणवादी विचारांविरोधातील ही लढाई आहे. एनआरसी, सीएए हे मुस्लीमविरोधात नसून मुस्लीम फक्त बहाणा आहे. देशातील एससी, एसटी, ओबीसी हा त्यांचा निशाणा आहे.
ही लढाई सर्व एकत्र येऊन लढलो तर आपण नक्कीच जिंकू. त्यासाठी फक्त सभांना गर्दी करून शक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी गावागावात, मोहल्ल्यांमध्ये त्याविरोधात प्रचार केला पाहिजे. तिन्ही लष्कराचा प्रमुख बिपीन रावत झाले. रावत हे संघाचे असून त्या माध्यमातून मोदी देशात हुकूमशाही आणू इच्छित आहे,’ असा गंभीर आरोप बी.जी. कोळसे पाटील यांनी केला आहे.