कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. पवारांनीही चंद्रकांत पाटलांना चांगलाच खोचक टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्यावर आपण काय बोलावं, असा टोला पवारांनी लगावला. चिठ्ठ्या वाटल्याबाबत खरं काय आणि खोटं काय माहित नाही. पण वर्तमानपत्रात वाचलं होतं, असंही सांगायला पवार विसरले नाहीत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. पवार म्हणाले होते, भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही. दिल्लीत विविध राज्याचे लोक राहतात असं पवार म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षासोबत भाजपला हरवण्यासाठी हातमिळवणी केली होती.’ शिवाय ‘आप’ला मिळालेल्या यशात शरद पवारांचं काहीही योगदान नाही, त्यामुळे त्यांनी त्याचा टेंभा मिरवू नये, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला होता.