मुंबई : नागरिकत्व सुधारण कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले ती ताकद कुणाला दाखवली. मला आज पर्यंत कळलं नाही. मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रविवार (९ फेब्रुवारी) दिला आहे.
देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला अलोट गर्दी उसळली होती. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना राज यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.