मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी बैठक आज मुंबई येथे पार पडली. बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आपले काम चोखपणे केले सुपर ६० हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यघटनेची मूलभूत तत्वे हेच काँग्रेसचे तत्वज्ञान आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न करू अशी हमी त्यांनी दिली.
इतर राज्यापेक्षा युवक काँग्रेसचे काम महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे सुरू असल्याचे भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी हरपाल सिंह यांनी नमूद केले. तसेच, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसला आणखी वेगळ्या उंचीवर न्यावे असे आवाहन त्यांनी केले. युवक काँग्रेसने तळागाळापर्यंत जनतेची कामे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असे आवाहन सत्यजीत तांबे यांनी केले.
पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी युवा जोडो अभियान, राजीव गांधी फेलोशिप, सुपर १००० आणि सरकार आपल्या दारी हे महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केले असल्याची माहिती त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दिली.
या बैठकीस भारतीय युवक काँग्रेसचे विभागीय समन्वयक श्रावण राव, प्रदीप सिंधवा, विजय सिंह तसेच गौरव श्रीमाली यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.