मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातलं काही कळत नाही. त्यांनी विकासकामांना स्थगिती देऊन विकास कामांना खिळ लावण्याचा प्रयत्न केला असून हे सरकार जनतेचं नसून स्थगिती सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी आज केली.
नारायण राणे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होणार आहे. दहा दिवस झाले तरी नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. सहा मंत्र्यांना अजूनही खाती दिलेली नाहीत. राज्याच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ मेट्रोसारख्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. मी तर म्हणतो हे स्थगिती सरकारच आहे. राज्याला पोषक नसलेलं तीन पक्षाचं हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे पाहुणं सरकार आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा काही अनुभव नाही. त्यांनी कुठल्याही संस्थेत काम केल्याचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांना प्रशासनातील एबीसीडीही कळत नाही, असा टोला राणे यांनी हाणला. यावेळी राणे यांनी त्यांच्या आगामी दौऱ्याचीही माहिती दिली. १५ ते १८ ऑक्टेबरपर्यंत आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यात गावागावांना भेटी देणार आहोत. या भेटीदरम्यान जनतेला या निवडणुकीमध्ये भाजप सरकार स्थापन का करू शकलं नाही? तीन पक्षाचं सरकार राज्याला पोषक नाही या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच नव्या सरकारकडून विकास कामांना खिळ बसविली जात असल्याबद्दल जनतेत जागृती निर्माण केली जाणार आहे, असेही राणे म्हणाले.