नागपूर: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार ‘तीनचाकी’ आहे. ती धावून धावून किती धावणार, असा चिमटा फडणवीस यांनी काढला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘होय आमचं सरकार ‘तीन चाकी’ आहे. कारण, गोरगरिबांना तीन चाकी रिक्षाच परवडते. बुलेट ट्रेन परवडत नाही. परवडणार नाही.’ असा टोला ठाकरे यांनी लगावला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आज गुरुवारी उद्धव ठाकरे विधानसभेत बोलत होते. अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली होती. विरोधकांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्याला व टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिले. राज्यपालांचं भाषण आणि त्यांनी मांडलेली सरकारची ध्येयधोरणं ही प्रगतीची गीता आहे. स्थगितीची नव्हे, असं उद्धव यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
‘ट्रेड मिलवर चालणाऱ्यास वाटतं की आपण खूप चाललो. पण तो असतो तिथंच. गेले काही दिवस काहींना असंच वाटत होतं. पण आमचं तसं होणार नाही. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे आमच्या सरकारचं धोरण आहे,’ असाही टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हाणला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘सामना’त आलेल्या टीकेचे दाखले देऊन भाजपनं शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. याच ‘सामना’नं पंतप्रधान मोदींची स्तुतीही केली होती. मात्र, सोयीचं तेवढं दाखवायचं, असं भाजपचं धोरण आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असा टोला मुख्यमंत्र्यांना हाणला होता. मुनगंटीवार यांच्या या टीकेला त्यांनी कवितेतून प्रत्युत्तर दिले. ‘मुनगंटीवार सुधीर, नका होऊ इतके अधीर… झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार…’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. शेतकऱ्यांचा कळवळा तुम्ही आम्हाला शिकवू नका. शेतकऱ्यांना दिलेलं वचन आम्ही पाळणारच आहोत,’ असंही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. यानंतर बराचं गोंळध झाला.