मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गुरुवारी दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानंतर त्यांनी इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांना सांगितलं की, १४ एप्रिल २०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करु. असं सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाविषयी आपण माहिती घेतली, स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार असून या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार आहोत. सर्व अडचणी दूर करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
“सगळ्या परवानग्या मिळाल्या असून काही बाकी आहेत. राज्य सरकारच्या अख्त्यारित सर्व परवानग्या असल्याने त्या मिळण्यात अडचण येणार नाही,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच स्मारकाच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही, त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करु असंही यावेळी ते म्हणाले.