नागपूर हिवाळी अधिवेशन दोन दिवसांपासून गोंधळातच सुरु आहे. शेतक-यांच्या मदतीसाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी सत्ताधारी- विरोधकांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. परंतु नको त्या मुद्यांवर वाद घालणा-या विरोधकांनी आडमुठेपणा न करता सभागृहामध्ये चर्चा करण्याची गरज आहे. आधीच्या सत्ताधा-यांनी म्हणजेच आताच्या विरोधकांनी पूर्वी केलेल्या घोटाळ्यांवर चर्चा होऊ नये असा त्यांच्यावर आरोप होत आहे. म्हणून विरोधक नको ते विषय उकरून गोंधळ घालण्याचा प्रकार करत आहेत.
महाराष्ट्रावर भाजपच्या तत्कालीन सरकारने कर्जाचा डोंगर उभा केलेला आहे. सध्या महाराष्ट्रावर ६ लाख ७१ हजार कोटींचा कर्ज करुन राज्याला खड्यात घालण्याचे काम केले आहे. राज्याची परिस्थिती बिकट झाली आहे. क्यार, व महाचक्रीवादळामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ९३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यावर चर्चा होणे गरजेचं आहे. परंतु नको त्या विषयावर चर्चा गोंधळ घालून त्याच्यावर चर्चा होत आहे. दोन दिवसांपासून विरोधकांचा गोंधळ सुरु आहे तो न शोभणारा आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी विरोधकांना चांगलेच सुनावले. ते योग्यही आहे. जे विरोधक इथं बोंबलताहेत, त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडं जाऊन गळा मोकळा करावा. वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असं उध्दव यांनी सुनावलं.
राज्य सरकारने पूरग्रस्त आणि अवकाळी ग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केली आहे. महाराष्ट्रात पुरामुळे तसंच अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केंद्राकडे जवळपास 15 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 2100 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. हे सर्व सुरु असतांना विरोधकांनी शेतक-यांसाठी पुढाकार घेऊन सरकारसोबत काम करणे गरजेचं आहे.
राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 7400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. खरतरं केंद्रात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात भाजप हा विरोधी बाकावर बसलेला आहे. परंतु राज्यातील शेतक-यांना मदत मिळावी यासाठी विरोधकांनी पुढाकार घेऊन केंद्राकडून निधी आणण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला मदत करायला हवी. परंतु राज्यातील विरोधकांना शेतक-यांशी काही देणं घेण नाही. ही वेळ राजकारणाची नाही. विरोधकांनी सत्ताधा-यांनी जरुर जाब विचारला पाहिजे. परंतु नुकतेचं सरकार स्थापन झाले. या सरकारच हे पहिलं अधिवेशन आहे. मात्र, हे अधिवेशन दोन दिवसांपासून गोंधळात जात असल्यामुळे राज्याच्या हिताबाबत दुर्लक्ष होत आहेत.
राज्याचे हितं बघता विरोधक आणि सत्ताधा-यांनी एकदिलाने काम करावे. राज्याला सुजलाम् सुफलाम् बनवावे एवढीच राज्यातील जनतेची माफक अपेक्षा आहे.
लेखक-परवेज खान